कोविड, ओमायक्रोनचा प्रसार रोखण्याकरिता ठाणे जिल्ह्यात सुधारित निर्बंध लागू
लग्न समारंभ, सामाजिक- धार्मिक कार्यक्रमांसाठी 50 लोकांनाच परवानगी
ठाणे, दि. 31 (जिमाका) :- ठाणे
जिल्ह्यात कोविड आणि ओमायक्रोनचा प्रसार होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून
राज्य शासनाच्या निर्देशानुसार ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी आणखी कडक
निर्बंध लागू केले आहेत. त्यानुसार आता लग्न समारंभ, सामाजिक, धार्मिक, क्रीडा
स्पर्धा, संमेलने/मेळावे, सांस्कृतिक व राजकीय कार्यक्रमांसाठी सुधारित 31 डिसेंबर 2021 च्या
मध्यरात्रीपासून निर्बंध लागू झाले आहेत.
जिल्हाधिकारी
कार्यालयाने काढलेल्या परिपत्रकानुसार, बंदिस्त ठिकाणी किंवा खुल्या दालनात संपन्न होणाऱ्या लग्न समारंभांसाठी
उपस्थितांची मर्यादा 100 वरून 50 करण्यात आली आहे. त्याच प्रमाणे दालनात किंवा
खुल्या जागेत होणाऱ्या धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक किंवा राजकीय कार्यक्रमांसाठी ही सदर मर्यादा 50 करण्यात आली आहे.
तसेच अंतिम संस्कारासाठी केवळ 20 लोकांना मुभा देण्यात आली आहे. याशिवाय यापूर्वी
27 नोव्हेंबर 2021 व 24 डिसेंबर 2021 रोजीच्या आदेशानुसार लागू करण्यात आलेले इतर
निर्बंध कायम राहणार आहेत.
या निर्बंधाचे
उल्लंघन केल्यास किंवा आदेशाचे पालन करण्यास टाळाटाळ केल्यास संबंधितांविरुद्ध
आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, साथरोग नियंत्रण
अधिनियम व भारतीय दंड संहितेनुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी श्री. नार्वेकर यांनी कळविले आहे.
Comments
Post a Comment