राज्यांतर्गत पिक स्पर्धेत सहभागी होण्याचे ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आवाहन
ठाणे दि. 22(जिमाका) :- राज्यातील पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी, शेतीत विविध प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने तृणधान्य व कडधान्य पिकांची राज्यांतर्गत पिक स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील भात व नागली पिक उत्पादक शेतकऱ्यांनी 31 ऑगस्ट 2022 पर्यंत अर्ज करावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मोहन वाघ यांनी केले आहे.
प्रयोगशील शेतकऱ्यांचे मार्गदर्शन इतर शेतकऱ्यांना मिळावे, पिक उत्पादनात वाढ व्हावी, तंत्रज्ञानाचा प्रसार व्हावा, या उद्देशाने राज्य शासनाच्या वतीने तृणधान्य व कडधान्य पिकांची राज्यांतर्गत पिक स्पर्धा आयोजित केली जाते. ही स्पर्धा तालुका पातळी, जिल्हा पातळी, विभाग व राज्य पातळी यास्तरावर आयोजित केली जाते.
ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खरीप हंगामासाठी भात व नागली पिकांचा समावेश स्पर्धेसाठी करण्यात आला आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी किमान 10 गुंठे लागवड क्षेत्र असावे. शेतकऱ्यांनी स्वतःच्या जमिनीचा सात बारा, आठ अ, आदिवासी बांधवांनी जातीचा दाखला देणे आवश्यक आहे. पिकनिहाय प्रत्येकी 300 रुपये स्पर्धेचे प्रवेश शुल्क भरावे लागणार आहे.
या स्पर्धेतील विजेत्यांना रोख बक्षिसे दिली जातात. तालुका पातळीवर पहिल्या तीन क्रमांकांना अनुक्रमे पाच हजार, तीन हजार व दोन हजार तर जिल्हा पातळीवरील विजेत्यांना दहा हजार, सात हजार व पाच हजार रक्कम बक्षिस म्हणून दिली जाते. विभागीय पातळीवरील पहिल्या तीन क्रमांना अनुक्रमे 25 हजार, 20 हजार व 15 हजार आणि राज्य स्तरीय विजेत्यांतील पहिल्या क्रमांकास पन्नास हजार, दुसऱ्या क्रमांकास 40 हजार आणि तृतीय क्रमांकास 30 हजार इतकी बक्षिसाची रक्कम दिली जाते.
ठाणे जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांना स्पर्धेत सहभाग घ्यायचा आहे, अशा शेतकऱ्यांनी तालुका कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन श्री. वाघ यांनी केले आहे.
0000000
Comments
Post a Comment