विशेष लेख क्र.07 - एकात्म मानवतावाद : सुशासनासाठी भारताचा मौलिक दृष्टिकोन
आज स्वातंत्र्यप्राप्त भारत अमृत काळाच्या उंबरठ्यावर उभा असला तरी संपूर्ण जग अनिश्चिततेच्या वळणावर उभे आहे. या पार्श्वभूमीवर, नेहमीच सर्वसमावेशक आणि निसर्ग केंद्रित प्रगती साध्य करण्याचा दृष्टिकोन स्वीकारणारा भारत, आज संपूर्ण जगासाठी शाश्वत विकासाचा आदर्श ठरत आहे. निसर्गाकडे केवळ एक संसाधन म्हणून पाहणाऱ्या पाश्चिमात्य संस्कृतीला आज उत्तरं सापडत नाही. समाजवाद, साम्यवाद आणि भांडवलशाही यांसारख्या मतप्रणालींमध्ये अडकलेले व्यवस्थापन कोसळत आहेत किंवा अंतर्गत व बाह्य संघर्षात गुरफटले आहेत.
भारताच्या स्वातंत्र्याच्या वेळी, देश देखील अशाच एका द्विधा स्थितीत होता. तत्कालीन सत्ताधाऱ्यांना भारताच्या वैशिष्ट्यपूर्ण गरजांना साजेसा विकासाचा मार्ग ठरवता आला नाही आणि ते या तिन्ही विचारसरणींमध्ये हेलकावत राहिले. अशा परिस्थितीत, एका दूरदर्शी विचारवंताने एकात्म मानवतावाद या चिरंतन तत्त्वज्ञानाचा प्रस्ताव मांडला. हा विचार मांडणारे होते पंडित दीनदयाळ उपाध्याय, जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) प्रचारक आणि भारतीय जनसंघाचे (आजच्या भारतीय जनता पक्षाचे) संस्थापक सदस्य होते. परंतु त्यांनी वारंवार स्पष्ट केले की हा विचार त्यांनी निर्माण केलेला नसून, तो भारताच्या प्राचीन ज्ञानपरंपरेची शिकवण आहे. सनातन संस्कृतीमध्ये रुजलेलं हे तत्त्वज्ञान आजही तितकंच सुसंगत आहे. त्यांच्या 57 व्या पुण्यतिथीनिमित्त, 11 फेब्रुवारी रोजी, या आधुनिक ऋषीच्या योगदानाला आपण स्मरुया.
सर्वसमावेशक मानवी विकासाची दृष्टी
पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी, त्यांच्या लहानशा पण प्रभावी आयुष्यात जगाला एक मार्गदर्शक तत्त्व दिलं—ते म्हणजे, माणसाला तुकड्यांत विभागून नव्हे, तर संपूर्णतेने पाहिलं पाहिजे. म्हणजेच शरीर, मन, बुद्धी आणि आत्मा यांचा समतोल साधत मानवाचा विचार केला पाहिजे. तसेच संपूर्ण विश्व एकमेकांशी जोडलेलं आहे, याची जाणीव ठेवली पाहिजे. पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या पंचतत्त्वांची परस्परपूरक समज विकसित करून त्यानुसार मानवी कृती घडल्या पाहिजेत. निसर्गाचा सन्मान आणि त्याचे संवर्धन हे आपल्या जीवनपद्धतीचा अविभाज्य भाग असले पाहिजे.
संयुक्त राष्ट्रसंघाने (UN) पंडित दीनदयाळ उपाध्याय किंवा त्यांच्या तत्त्वज्ञानाला औपचारिक मान्यता दिलेली नसली, तरी 25 सप्टेंबर 2015 रोजी स्वीकारलेल्या 17 सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स (SDGs) हे एकात्म मानवतावादाचे प्रतिबिंब आहेत. योगायोग म्हणजे, याच दिवशी त्यांचे जन्मशताब्दी वर्ष देखील सुरू झाले होते.
एकात्म मानवतावाद हा मानवकेंद्री विचार असून पंडित दीनदयाळ उपाध्याय मानत की, जसा व्यक्तीला आत्मा असतो, तसाच राष्ट्रालाही चिती म्हणजेच राष्ट्रीय चेतना असते. त्यांच्या मते, भारताचा आत्मा त्याच्या गावांमध्ये आहे आणि खऱ्या अर्थाने हा ग्रामीण समाजच राष्ट्राचे अन् आत्म्याचे रक्षणकर्ते आहेत. त्यामुळे संपूर्ण देशाचा विकास हा केवळ ग्रामविकासाद्वारेच साध्य होऊ शकतो.
ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी, त्यांचे निकटवर्तीय नानाजी देशमुख यांनी दीनदयाळ रिसर्च इन्स्टिट्यूट (DRI) ची स्थापना केली. सर्वांगीण ग्रामीण विकासासाठी कार्य करणाऱ्या या संस्थेने गोंडा, बीड आणि चित्रकूट येथे विकास प्रकल्प राबवत स्थानिक ज्ञान आणि आधुनिक उपाय यांचा संगम घडवला. या कार्याच्या गौरवार्थ नानाजी देशमुख यांना 2019 मध्ये भारतरत्न प्रदान करण्यात आला.
विचारवंत, नेते आणि मार्गदर्शक पंडित दीनदयाळ उपाध्याय हे भारतीय जनसंघाचे सिद्धांतकार आणि संघटनात्मक मार्गदर्शक होते. 1952 साली जनसंघाच्या स्थापनेपासून ते 15 वर्षे सरचिटणीस राहिले, आणि डिसेंबर 1967 साली त्यांनी अध्यक्षपद भूषवले. त्यांच्या नेतृत्वाखाली जनसंघाने भारतीय राजकारणात मजबूत पाया रचला. मात्र, केवळ 51 व्या वर्षी, गूढ परिस्थितीत त्यांचे अकाली निधन झाले.
त्यांचा अभ्यास केवळ भारतापुरता सीमित नव्हता; ते जागतिक आर्थिक-सामाजिक घडामोडींवरही नजर ठेवून होते. त्यांच्या भाषणांमधून त्यांनी भारतीय जनतेला आत्मसन्मान जपण्यास प्रेरित केलं. त्यांनी मार्गदर्शन केलं की परिश्रम, धर्म (कर्तव्य), अर्थ (समृद्धी), काम (इच्छापूर्ती) आणि मोक्ष (अंतिम मुक्ती) या चार पुरुषार्थांचा योग्य समतोल राखून जीवन जगावं. त्यांनी भारतीय संस्कृतीला धरून प्रगतीचा मार्ग आत्मसात करण्यास सांगितले. भारतीय समाजाला नेहमीच देशानुकूल आणि युगानुकूल विचारसरणी स्वीकारण्याचं आवाहन त्यांनी केलं.
भारतासाठी पुढील मार्ग
आज भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश म्हणून आपली हरवलेली सभ्यतावादी वैशिष्ट्य पुन्हा प्रस्थापित करू पाहत आहे. ऐतिहासिक भान, संस्कृती आणि परंपरा यांना आत्मसात करून भारत विकासाची नवी परिभाषा जगासमोर मांडण्याचे उद्दिष्ट बाळगतो.
पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी विचारलं होतं की, आंतरराष्ट्रीय संस्था आणि परदेशी संस्थांनी भारताचा विकासदर, साक्षरता किंवा आरोग्य परिस्थिती का ठरवावी? जर भारताने स्वतःचे मापदंड ठरवले नाहीत, तर बाहेरून आलेल्या शक्ती आपली मते लादत राहतील, हे त्यांनी अनेक वर्षांपूर्वीच ओळखलं होतं.
आजचा भारत एकात्म मानवतावाद या तत्त्वज्ञानाला आत्मसात करून ‘अंत्योदय’ – म्हणजेच समाजातील शेवटच्या माणसाच्या उत्थानावर भर देणारी धोरणं राबवतो आहे. केंद्र आणि विविध राज्य सरकारांच्या योजनांमध्ये त्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनाचा स्पष्ट प्रभाव दिसून येतो. गरीबांसाठी कल्याणकारी योजना असोत, संरक्षणातील आत्मनिर्भरता असो, की अंतराळ संशोधनातील यश – भारताची वाढती ताकद त्यांच्याच विचारसरणीची प्रचीती आहे.
त्यांच्या विचारसरणीने भारताला एका कमकुवत आणि संभ्रमित राष्ट्रातून एक आत्मसन्मान आणि आत्मनिर्भरतेचा आदर्श घडवला आहे. आजचा भारत एका उज्ज्वल भविष्याच्या दिशेने दिमाखात वाटचाल करत आहे.
-मंगल प्रभात लोढा
मंत्री, कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग, महाराष्ट्र सरकार
Comments
Post a Comment