ठाणे जिल्ह्याची जिल्हा सल्लागार व आढावा समिती बैठक संपन्न
शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
ठाणे, दि.17(जिमाका):- ठाणे जिल्ह्याची जिल्हा सल्लागार समिती (DCC) व जिल्हास्तरीय आढावा समिती (DLRC) बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे
जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली यशस्वीरीत्या पार पडली.
या
बैठकीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी वार्षिक कर्ज योजना (ACP) २०२५-२०२६ अंतर्गत बँकांच्या कामगिरीचा सविस्तर
आढावा घेतला. यामध्ये प्रामुख्याने स्वयं सहाय्यता गट (SHG) कर्ज, प्रधानमंत्री
सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME), प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (PMEGP), मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP), प्रधानमंत्री विश्वकर्मा, प्रधानमंत्री स्वनिधी, प्रधानमंत्री मुद्रा योजना तसेच राज्य
शासनाच्या विविध विकास महामंडळांच्या योजनांचा समावेश होता.
बँकांनी
कर्ज मंजूर करून शासकीय योजनांचा लाभ वंचित घटकांपर्यंत पोहोचवावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले.
मात्र, खासगी क्षेत्रातील बँकांची कामगिरी
शासकीय योजनांच्या बाबतीत अत्यंत निकृष्ट असल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त
केली.
जिल्ह्यातील
कर्ज-ठेव गुणोत्तर (CD
Ratio) सुधारण्यावर
भर देतानाच, आर्थिक समावेशन अंतर्गत सामाजिक
सुरक्षा योजनांमध्ये-प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY), प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY) आणि अटल पेन्शन योजना (APY)-बँकांनी केलेल्या कामावरही सविस्तर चर्चा
करण्यात आली. राष्ट्रीय आर्थिक समावेशन धोरण (NSFI) २०२५-२०३० अंतर्गत कृती आराखड्याचा आढावा घेतानाच, प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचा विस्तार आणि तिची
प्रभावी अंमलबजावणी यावर विशेष भर देण्यात आला.
यासोबतच
नाबार्डशी संबंधित विषय, ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था
(RSETI) व आर्थिक साक्षरता केंद्रे (FLC/CFL) यांच्या कार्यपद्धतीवरही चर्चा करण्यात आली.
जिल्हाधिकारी
डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी सर्व बँकांना शासकीय पुरस्कृत योजनांतर्गत निर्धारित
उद्दिष्टे वेळेत पूर्ण करण्यासाठी आपली कामगिरी अधिक सुधारण्याच्या कडक सूचना
दिल्या. सर्व बँका आणि शासकीय विभागांनी परस्परांशी समन्वय राखून कर्ज वितरण, आर्थिक समावेशन आणि सर्व शासकीय योजनांची
प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करावी, असे
निर्देशही त्यांनी दिले.
या
बैठकीस अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री. हरिश्चंद्र पाटील, आरबीआयचे एलडीओ श्री.निशांत यादव (ऑनलाईन), नाबार्डचे डीडीएम श्री. सुधांशुकुमार अश्विनी, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक श्री.अभिषेक पवार, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक सौ.
सोनाली देवरे, टीडीसीसीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी
श्री. राजेंद्र भेरे, आरसेटीचे संचालक श्री. आशिष लोहकरे
यांच्यासह विविध शासकीय विभागांचे प्रमुख, विकास
महामंडळांचे जिल्हा व्यवस्थापक आणि बँकांचे जिल्हा समन्वयक उपस्थित होते.
00000
.jpeg)
Comments
Post a Comment