जिल्ह्यांमध्ये 8 ते 14 एप्रिल दरम्यान 'सामाजिक समता सप्ताह' साजरा होणार विविध कार्यक्रमांचे आयोजन
ठाणे,दि.8
(जिमाका): भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाच्या
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे संपूर्ण राज्यात 8 एप्रिल ते 14 एप्रिल 2026
या कालावधीत 'सामाजिक समता सप्ताह' साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सप्ताहाच्या
माध्यमातून सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवणे आणि महामानवांच्या
विचारांचा जागर करणे हा मुख्य उद्देश आहे.
या सात दिवसांत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात
आले आहे. 8 एप्रिल: सप्ताहाचे उद्घाटन आणि प्रत्येक कुटुंबाला भारतीय संविधानाच्या
उद्देशिकेच्या प्रतीचे वाटप केले जाईल, 9 व 10 एप्रिल: शाळा आणि महाविद्यालयांमध्ये
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर व्याख्याने, निबंध आणि वकृत्व स्पर्धा घेतल्या
जातील. तसेच 'चवदार तळे सत्याग्रह' शताब्दी वर्षानिमित्त मानवी हक्कांवर विशेष कार्यक्रम
होतील, 11 एप्रिल: महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंतीनिमित्त त्यांच्या
सामाजिक कार्यावर आधारित विशेष कार्यक्रम आयोजित केले जातील, 12 एप्रिल: 'संविधान जागर'
अंतर्गत संविधानातील मूलभूत अधिकार आणि कर्तव्यांविषयी मार्गदर्शन केले जाईल. तसेच
महिलांसाठी विशेष मेळावे आयोजित करून डॉ. आंबेडकरांनी महिलांच्या प्रगतीसाठी केलेल्या
कामाची माहिती दिली जाईल, 13 एप्रिल: ज्येष्ठ नागरिकांचे मेळावे, आरोग्य विभागाच्या
मदतीने रक्तदान शिबिरे आणि विविध वस्त्यांमध्ये स्वच्छता अभियान राबवले जाईल. या दिवशी
जिल्हा जात पडताळणी कार्यालयामार्फत ऑनलाईन वैधता प्रमाणपत्रांचे वाटपही करण्यात येईल,
14 एप्रिल: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी त्यांना अभिवादन करून
सप्ताहाचा समारोप होईल. यावेळी शेतकऱ्यांसाठी बाबासाहेबांनी केलेल्या कार्यावर विशेष
व्याख्याने आयोजित केली जातील.
जिल्हास्तरावर सामाजिक कल्याण विभागाचे सहाय्यक
आयुक्त या सर्व कार्यक्रमांची जबाबदारी सांभाळणार असून ठाणे जिल्ह्यातील नागरिकांनी
या सप्ताहातील विविध कार्यक्रमांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सामाजिक
न्याय विभागाच्या वतीने सहायक आयुक्त समाधान इंगळे यांनी केले आहे.
0000000000
Comments
Post a Comment