महिला सक्षमीकरण ठाणे जिल्ह्याची सुरक्षा कवच डॉ. अनिता जवंजाळ यांची आपत्ती व्यवस्थापनातील धडाकेबाज यशोगाथा

 


 



                       केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने सध्या 'महिला सक्षमीकरण' मोहिमेचा जागर सुरू असताना, ठाणे जिल्ह्यामध्ये आपल्या कर्तृत्वाने प्रशासकीय सेवेचा ठसा उमटवणाऱ्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. अनिता जवंजाळ-भोईर यांची कामगिरी खऱ्या अर्थाने कौतुकास्पद आणि प्रेरणादायी ठरली आहे. डिसेंबर २०१८ पासून या आव्हानात्मक पदाची धुरा सांभाळणाऱ्या डॉ. जवंजाळ यांनी केवळ नैसर्गिक आपत्तीच नव्हे, तर मानवनिर्मित संकटांच्या काळातही अत्यंत धैर्याने आणि संवेदनशीलतेने काम केले आहे.  

त्यांच्या या ७-८ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी कोविड-१९ च्या तिन्ही लाटांमध्ये अहोरात्र सेवा बजावून प्रशासनाचा कणा म्हणून काम केले. महालक्ष्मी एक्सप्रेस अडकलेली असताना प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्याचे मोठे आव्हान असो किंवा भीषण चक्रीवादळाने निर्माण केलेली संकटे असोत, डॉ. जवंजाळ यांनी घटनास्थळी राहून बचाव आणि मदत कार्याचे चोख नियोजन केले. त्यांचे कार्य केवळ जिल्ह्यापुरते मर्यादित राहिले नाही, तर युक्रेन, इराण आणि इस्राईलमधील युद्धजन्य परिस्थितीत अडकलेले ठाणे जिल्ह्यातील विद्यार्थी आणि नागरिक यांना सुरक्षित मायदेशी परत आणण्यासाठी त्यांनी राज्य आणि केंद्र स्तरावर समन्वय साधून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. याशिवाय उत्तराखंड किंवा इतर पर्यटन स्थळी नैसर्गिक आपत्तीत अडकलेल्या नागरिकांसाठी त्या 'संकटमोचक' म्हणून धावून गेल्या आहेत.

केवळ संकट आल्यावर काम न करता, 'आपत्तीपूर्व सज्जता' या विषयावर त्यांनी विशेष भर दिला आहे. ठाणे जिल्ह्यासाठी त्यांनी 'आपदा ५००' या स्वयंसेवकांच्या फौजेला विशेष प्रशिक्षण दिले असून, याद्वारे स्थानिक स्तरावर आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी सक्षम फळी निर्माण केली आहे. पथनाट्य, भारूड आणि लोकनाट्य यांसारख्या लोककलांच्या माध्यमातून त्यांनी आपत्ती व्यवस्थापनाचा विषय जनमानसात अत्यंत प्रभावीपणे पोहोचवला आहे. डॉ. जवंजाळ यांचे शैक्षणिक यशही तितकेच थक्क करणारे आहे; मास मीडिया आणि कम्युनिकेशनमध्ये पीएच.डी. संपादन केल्यानंतर त्यांनी आपत्ती व्यवस्थापन आणि इंडस्ट्रियल फायर सेफ्टीमध्येही पदव्युत्तर पदविका मिळवून आपल्या कामात तांत्रिक अचूकता आणली आहे.  

सध्याच्या महिला सक्षमीकरण पंधरवड्यात डॉ. अनिता जवंजाळ यांची ही यशोगाथा समाजासमोर एक आदर्श वस्तुपाठ सादर करते. ६ महानगरपालिका आणि ८ तालुक्यांच्या विस्तीर्ण कार्यक्षेत्रात आपत्ती व्यवस्थापनाचे धोरण राबवताना, त्यांनी आपल्या जिद्दीने आणि कल्पकतेने प्रशासकीय सेवेत महिलांचे नेतृत्व किती कणखर असू शकते, हे सिद्ध केले आहे. त्यांच्या या अविरत कार्यामुळे ठाणेकरांना आज एक सुरक्षित आणि सजग प्रशासकीय कवच लाभले आहे.

0000000000

Comments

Popular posts from this blog

गायमुख घाटामधील वाहतूक कोंडीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ ॲक्शन मोडमध्ये

विशेष लेख क्र.33 - जिल्हाधिकारी अशोक शिनगारे: लोकसेवेचा दीपस्तंभ

तहसिलदारांच्या खुर्चीत शिपाई..! ; 36 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर तातू ठाकरेंचा अनोखा गौरव