‘जन भागीदारी’ अभियानातून आदिवासी विकासाचा नवा संकल्प शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा प्रभावी उपक्रम
ठाणे,दि.22(जिमाका)
:- आदिवासी
बांधवांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ थेट आणि अत्यंत प्रभावीपणे मिळावा,
या उदात्त उद्देशाने शिवभक्त आदिवासी आश्रमशाळा, लव्हाळी येथे “जन भागीदारी
- सर्वात दूर, सर्वात पहिले” या देशव्यापी
माहिती, शिक्षण व संपर्क (IEC) अभियानाचे अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वी आयोजन
करण्यात आले होते. या अभियानाने दुर्गम भागातील तळागाळातील जनतेपर्यंत विकासाची एक
नवी आशा पोहोचवली असून आदिवासी विकासाचा एक नवा संकल्प या निमित्ताने दृढ झाला आहे.
या महत्त्वपूर्ण
अभियानाची सुरुवात शिक्षण विस्तार अधिकारी घोलप आर.बी., शिक्षण विस्तार अधिकारी शिंदे के.एम., विस्तार अधिकारी मोहेकर, लव्हाळी
आश्रमशाळेच्या मुख्याध्यापिका बुटेरे एस.आर.,
लव्हाळीचे मुख्याध्यापक तारमळे सी.बी., कारावचे
मुख्याध्यापक गोंधळी एस. डी. आणि सोनावळा प्राथमिक आरोग्य केंद्राचे जाधव टी.व्ही. यांच्या शुभहस्ते 'धरती आबा बिरसा
मुंडा' यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.
या विशेष अभियानांतर्गत
'PM JANMAN' आणि 'DA-JGUA' या अत्यंत महत्त्वाकांक्षी योजनांची सविस्तर माहिती देऊन
आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाकडून राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांबाबत
व्यापक जनजागृती करण्यात आली. अभियानाचा एक मुख्य भाग म्हणून आयोजित करण्यात आलेल्या
संतृप्ति मेळाव्याच्या माध्यमातून नागरिकांना रेशन कार्ड, जात प्रमाणपत्र, आधार कार्ड,
पेन्शन, विविध विमा योजना, घरकुल, आरोग्य, तसेच शिक्षण व शिष्यवृत्ती यांसारख्या अत्यंत
आवश्यक योजनांची महत्त्वपूर्ण माहिती एकाच ठिकाणी आणि एकाच वेळी उपलब्ध करून देण्यात
आली. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आणि त्यांच्या वेळेची बचत करण्यासाठी आधार कार्ड
आणि जात प्रमाणपत्रांशी संबंधित सर्व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता थेट जागेवरच करण्याची
विशेष व्यवस्था या मेळाव्यात करण्यात आली होती.
या सोहळ्यादरम्यान
नागरिकांसाठी एका भव्य आरोग्य शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात उपस्थित
नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी, सिकल सेल तपासणी आणि असंसर्गजन्य आजारांची विशेष तपासणी
करून आवश्यक तो औषधोपचार करण्यात आला. तसेच आरोग्य विभागामार्फत विविध आजारांवरील लसीकरणाविषयी
नागरिकांना मोलाचे समुपदेशन करण्यात आले. या अभियानात विविध सरकारी विभागांच्या अधिकाऱ्यांनी
प्रत्यक्ष उपस्थित राहून नागरिकांच्या समस्या अत्यंत तत्परतेने आणि सविस्तरपणे ऐकून
घेतल्या. अनेक समस्यांचे जागेवरच तात्काळ निराकरण करण्यात आल्यामुळे शासन आणि जनता
यांच्यातील विश्वासाचा दुवा अधिक सक्षम आणि दृढ झाल्याचे पाहायला मिळाले.
हे संपूर्ण अभियान
यशस्वी करण्यासाठी शिक्षण विस्तार अधिकारी घोलप आर.बी., शिक्षण विस्तार अधिकारी यांनी
शिंदे के.एम., मुख्याध्यापिका श्रीम. बुटेरे एस.आर., मुख्याध्यापक तारमळे सी.बी., मुख्याध्यापक,
गोंधळी एस. डी. आणि सोनावळा प्राथमिक आरोग्य केंद्राचे, जाधव टी.व्ही. यांनी विशेष
परिश्रम घेतले आणि त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. हे अभियान केवळ एक औपचारिक शासकीय
उपक्रम न ठरता, आदिवासी जनतेच्या खऱ्या अर्थाने सक्षमीकरणासाठी, त्यांच्या हक्कांच्या
जाणीवेसाठी आणि त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात सन्मानाने सहभागी करून घेण्यासाठी
उचललेले एक अत्यंत प्रभावी आणि प्रेरणादायी पाऊल ठरले आहे.
0000000000
Comments
Post a Comment