विश्वस्त या भावनेतून सरकारचे काम -मुख्यमंत्री फडणवीस
नवी मुंबई, दि.३१(जिमाका)- सरकार म्हणजे राज्याचे मालक नसून ते जनतेच्या
वतीने राज्याचे विश्वस्त असते, हीच भावना कायम ठेवून आमचे सरकार काम करते , असे
प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
श्री गोवर्धिनी सार्वजनिक सेवा
संस्था नवी मुंबई आयोजित नवी मुंबई उत्सव 2019 चे उदघाटन ना.फडणवीस यांच्या हस्ते
आज करण्यात आले. यावेळी माजी राज्यपाल डॉ.डी वाय पाटील, शिर्डी संस्थानचे अध्यक्ष
सुरेश हावरे, अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, सिडको चे
अध्यक्ष आ.प्रशांत ठाकूर, विधान परिषदेचे आ.रमेश पाटील, सिडकोचे व्यवस्थापकीय
संचालक लोकेश चंद्रा, विजय चौगुले, आ.मंदाताई म्हात्रे, जिल्हाधिकारी राजेश
नार्वेकर, नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त रामस्वामीआदी मान्यवर उपस्थित होते.
कै गणपतशेट तांडेल मैदान, नेरुळ येथे हा
शानदार कार्यकम आयोजित करण्यात आला होता. यावेळी गोवर्धिनी संस्थेच्या वतीने 11
लाख रुपयांचा निधी दुष्काळ निवारणासाठी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी धनादेश प्रदान
करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रिमोट द्वारे महोत्सवाचे
उदघाटन करण्यात आले.त्यानंतर आ.मंदाताई म्हात्रे यांच्या कार्य अहवालाचे फडणवीस
यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी फडणवीस यांच्या हस्ते नवी मुंबई खाडी
पुलावरून खाडीत पडलेल्या लोकांना वाचविणाऱ्या महेश अशोक सुतार यांचा तसेच
सुप्रसिद्ध गायक संगीतकार शंकर महादेवन यांचा सत्कार करण्यात आला.
आपल्या मनोगतात ना.फडणवीस म्हणाले की,
कार्य अहवाल म्हणजे निवडून आल्यानंतर लोकांना केलेल्या कामांची दिलेली छापील
माहिती, रामभाऊ म्हाळगी यांनी ही परंपरा सुरू केली. ज्या जनतेने आपणाला विश्वासाने
निवडून दिले. त्यांच्यासाठी काय केलं याची माहिती त्यांना देणे हे आपले कर्तव्य
आहे. आ.मंदाताई म्हात्रे यांनी हा अहवाल प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचवावा, असे
आवाहन करून त्यांनी नवी मुंबई महोत्सवाला शुभेच्छा दिल्या.
नवी मुंबई उत्सवाच्या निमित्ताने जनतेचे
एकत्रीकरण होणे ही चांगली बाब आहे,असे त्यांनी सांगितले. त्यानंतर मुख्यमंत्री
फडणवीस यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद घेतला. यावेळी आयोजित सांस्कृतिक
कार्यक्रमात शंकर महादेवन, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी,अभिषेक कांबळे, युक्ता
पाटील, सई जोशी आदी कलाकारांनी आपली कला सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले.या
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध अभिनेते दिग्दर्शक सुबोध भावे यांनी केले.
Comments
Post a Comment