राष्ट्रीय युवा दिन, राजमाता जिजाऊ जयंती, स्वामी विवेकानंद संस्थेचा 29 वा वर्धापन दिन सोहळा संपन्न...

 



 



ठाणे, दि.14(जिमाका) :- सरस्वती विद्यालय वासिंद येथे 'भारत सरकार : युवा कार्य व क्रीडा मंत्रालयाच्या मेरा युवा भारत केंद्र, ठाणे' तर्फे स्वामी विवेकानंद संस्था, पाली सरस्वती विद्यालय, वासिंद यांच्या विद्यमाने राष्ट्रीय युवा दिन, राजमाता जिजाऊ जयंती, स्वामी विवेकानंद संस्था पाली या संस्थेचा 29 वा वर्धापन दिन सोहळा जिल्हा युवा अधिकारी मनीषा शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार दिनांक 12 जानेवारी, 2026 रोजी मोठ्या आनंद उत्सवात संपन्न झाला...



यावेळी भारत सरकार, संसदीय कार्यमंत्रालय राजभाषा समितीचे सदस्य तथा सुप्रसिद्ध साहित्यिक प्रवीण देशमुख, वासिंद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर, शहापूर पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी हिराजी वेखंडे, वारकरी तत्त्वज्ञान विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष हभप डॉ.कैलास महाराज निचिते, विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष विठ्ठल सातवी व सचिव रविंद्र शेलार, सरस्वती विद्यालयाचे मुख्याध्यापक वासुदेव भोईर, मानव विकास सेवा फाउंडेशनचे संघटक व्ही. एस. पाटील, स्वामी विवेकानंद संस्था पाली या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा शिक्षणतज्ञ व प्रज्ञावंत साहित्यिक शारदासुत सुनील म्हसकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. यावेळी सरस्वती विद्यालय वासिंद येथील विद्यार्थ्यांनी सुमधुर सुरात ईशस्तवन सादर केले. त्यानंतर मान्यवरांचे स्वागत करून त्यांचा सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ व ऋणनिर्देश पत्रिका देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.

स्वामी विवेकानंद संस्था पाली या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुनील म्हसकर सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तर श्री. श्याम शेलार सर यांनी स्वामी विवेकानंद संस्थेचे राष्ट्रविकासातील योगदान व संस्थेची सन १९९७ पासून ते आजतागायतची २८ वर्षांची देदीप्यमान वाटचाल याविषयीच्या अहवालाचे प्रकट वाचन केले.

कार्यक्रम प्रसंगी प्रवीण देशमुख यांनी'आजच्या युवा पिढीसमोरील आव्हाने', केली हभप डॉ.कैलास महाराज निचिते यांनी 'स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांचा युवापिढीला आदर्श' आणि शारदासुत सुनील म्हसकर यांनी 'युवा तेजा जाग रे'... या विषयावर उत्तम उत्तम व्याख्याने सादर करून उपस्थितांचे प्रबोधन केले. तसेच सचिन हुंदळेकर, हिराजी वेखंडे,रविंद्र शेलार यांनी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमती मनीषा शर्मा यांनी भारत सरकार : युवा कार्य व क्रीडा मंत्रालयाच्या मेरा युवा भारत केंद्र, ठाणे या केंद्राचा हेतू, उद्देश स्पष्ट करून केंद्राच्या मार्फत ग्रामीण युवकांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, उपक्रम यांची सविस्तर माहिती देऊन युवकांना मोलाचे मार्गदर्शन केले.

यावेळी ठाणे जिल्ह्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय व देदीप्यमान कार्य करणाऱ्या विविध प्रभावी व गुणवंत व्यक्तींचा गौरवचिन्ह, पुष्पगुच्छ, पेन व प्रमाणपत्र देऊन गुणगौरव व सन्मान करण्यात आला.

सुनील म्हसकर यांनी आपल्या सुरेल आणि प्रखर आवाजात स्फूर्तीगीत सादर करून कार्यक्रमाची सांगता केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ह.भ.प.शिवाजी सातपुते यांनी अतिशय सुंदर प्रकारे केले. कार्यक्रमाच्या यशस्वीत्तेसाठी गीतांजली म्हसकर, आकाश म्हात्रे, अरुण भालेकर, श्याम शेलार, शिवाजी तरणे, दिलीप भोईर, दौलत चव्हाण, कुणाल म्हसकर, तुषार म्हसकर व जीवन म्हसकर आदींनी तसेच स्वामी विवेकानंद संस्थेच्या व विद्या विकास मंडळाच्या सर्व सन्माननीय पदाधिकारी व सदस्यांनी मोलाचे सहकार्य केले.

00000000000


Comments

Popular posts from this blog

गायमुख घाटामधील वाहतूक कोंडीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ ॲक्शन मोडमध्ये

विशेष लेख क्र.33 - जिल्हाधिकारी अशोक शिनगारे: लोकसेवेचा दीपस्तंभ

“पत्रकारितेची पाठशाळा - बातमी मागची गोष्ट” कार्यशाळा ठाण्यात उत्साहात संपन्न