जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू, उल्लंघन केल्यास कठोर कारवाई -- जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. राजेश नार्वेकर
ठाणे (जिमाका ) दि. २१ - भारत निवडणूक आयोगाने विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून जिल्ह्यात आजपासून आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. आदर्श आचारसंहितेचे पालन करणे प्रत्येक राजकीय पक्षासाठी व उमेदवारांसाठी बंधनकारक आहे. निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्री राजेश नार्वेकर यांनी केले.
ठाणे जिल्ह्यातील अठरा विधानसभा मतदार संघांसाठी दि.२१ ऑक्टोबरला मतदान तर दि.२४ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.निवडणुकीची अधिसूचना दि. २७ सप्टेंबर रोजी जाहीर होणार असून उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख दि. ४ ऑक्टोबर आहे. अर्जांची छाननी दि.५ ऑक्टोबर रोजी तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत ७ ऑक्टोबर आहे.
आदर्श आचारसंहितेच्या काळात राजकीय पक्षांनी व उमेदवारांनी “काय करावे किंवा करु नये” (“DOs & DON’Ts)ची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या https://ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. भारत निवडणूक आयोगाचे संकेतस्थळ https://eci.nic.in वर निवडणुकीसंदर्भातील सर्व सूचनांचा तपशील उपलब्ध आहे.
१९५० हेल्पलाईन, सी व्हीजिल मोबाईल ॲप, भरारी पथके, सीसीटीव्ही यंत्रणा अशा विविध तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सर्व निवडणूक यंत्रणेवर देखरेख व नियंत्रण ठेवले जाणार आहे. राजकीय पक्षांच्या प्रतिनिधीना देखील याबाबत अवगत करण्यात आले आहे. पोलीस यंत्रणा कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच निवडणुकांसाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे. निर्भय आणि मुक्त वातावरणात निवडणुका होतील असा विश्वास हि जिल्हाधिकारी श्री नार्वेकर यांनी व्यक्त केला. तसेच आचासंहितेचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात असा इशारा श्री नार्वेकर यांनी दिला आहे.
या निवडणूकीत प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आपले नाव मतदार यादीत असल्याची खातरजमा करून घेणे आवश्यक आहे. तरी सर्व मतदारांनी १९५० या टोल फ्री क्रमाकांवर संपर्क साधून आपले नाव मतदार यादीत असल्याची खात्री करून घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी श्री नार्वेकर यांनी मतदारांना केले..
Comments
Post a Comment