ठाणे जिल्ह्याच्या कृषी समृद्धीसाठी प्रशासन सज्ज खरीप हंगामात खते आणि बियाण्यांचा तुटवडा भासणार नाही याची खबरदारी घ्यावी -उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे

 




ठाणे दि.27(जिमाका):- खरीप हंगाम 2026-27 च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याची कृषी यंत्रणा सज्ज झाली असून, शेतकऱ्यांना बियाणे, खते आणि इतर निविष्ठा वेळेवर उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन पूर्णपणे कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील नियोजन भवनाच्या पहिल्या मजल्यावरील समिती सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या खरीप हंगाम पूर्वतयारी आढावा बैठक २०२६-२७ मध्ये ते बोलत होते. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील शेती आणि शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कृषी विभागाने आखलेल्या नियोजनाचा सविस्तर आढावा घेतला आणि उपस्थित अधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शक सूचना केल्या.

या बैठकीस आमदार किसन कथोरे, आमदार निरंजन डावखरे, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार डॉ. बालाजी किणीकर, आमदार शांताराम मोरे, आमदार राजेश मोरे, पालक सचिव नवीन सोना, जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रणजीत यादव, अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदीप माने, जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी, प्रांताधिकारी उर्मिला पाटील, उपजिल्हाधिकारी सर्जेराव म्हस्के-पाटील, शशिकांत गायकवाड, शिधावाटप उपनियंत्रक भास्कर तायडे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, प्रमोद काळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रामेश्वर पाचे, जिल्हा कृषी विकास अधिकारी मुनीर बाचोटीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, तहसिलदार रेवण लेंभे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित आहेत.

            बैठकीच्या सुरुवातीला उपमुख्यमंत्र्यांनी गेल्या हंगामातील कामांचा आढावा घेत आगामी वर्षासाठी तयार करण्यात आलेल्या प्रस्तावांचे कौतुक केले. त्यांनी स्पष्ट केले की, शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी आणि त्यांना उच्च दर्जाचे साहित्य मिळवून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने 'भरारी पथकां'च्या माध्यमातून बोगस बियाणे आणि खतांच्या काळाबाजारावर कठोर नजर ठेवावी. काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कार्यवाही करावी.  कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांचे नुकसान होता कामा नये, ही शासनाची प्राथमिकता आहे. विशेषतः भात शेतीमध्ये 'सगुणा तंत्रज्ञान' आणि यांत्रिकीकरणाचा वापर वाढवण्यावर त्यांनी भर दिला. या तंत्रज्ञानामुळे खर्चात बचत होऊन उत्पादकता वाढते, त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या प्रवाहात सामील करून घेण्याचे उद्दिष्ट कृषी विभागाने ठेवावे, असे निर्देश त्यांनी दिले.

            शाश्वत शेती ही काळाची गरज असल्याचे अधोरेखित करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्या आणि महिला बचत गटांच्या बळकटीकरणावर विशेष लक्ष केंद्रित करण्यास सांगितले. केवळ पारंपारिक शेतीवर अवलंबून न राहता शेतकऱ्यांनी बांबू लागवड, फुलशेती आणि नगदी पिकांकडे वळावे यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

            जिल्ह्याच्या दुर्गम भागातील शेतकऱ्यांना सिंचनाची सोय व्हावी यासाठी 'पीएम कुसुम योजने'तंर्गत सौर पंप आणि 'जलयुक्त शिवार २.०' अभियानांतर्गत जलसंधारणाची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी दिले. तसेच, नैसर्गिक आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांना वाऱ्यावर न सोडता, पीक विमा आणि इतर शासकीय मदतीचे वाटप पारदर्शक आणि गतिमान पद्धतीने करण्याबाबत त्यांनी प्रशासनाला सतर्क केले.

            शेतीच्या आधुनिकिकरणासाठी 'अॅग्रीस्टॅक' आणि डिजिटल नोंदणीचे महत्त्व सांगताना मुख्यमंत्री म्हणाले की, प्रत्येक पात्र शेतकऱ्याची नोंदणी वेळेत पूर्ण झाल्यास त्यांना शासनाच्या विविध योजनांचा थेट लाभ मिळणे सुलभ होईल. ठाणे जिल्हा हा विकासाच्या वाटेवर असून येथील बळीराजाला सक्षम करण्यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

            जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रामेश्वर पाचे यांनी या बैठकीसाठी आवश्यक माहितीचे सादरीकरण केले.

जिल्हा वार्षिक योजना नाविण्यपूर्ण योजनेंतर्गत  सुरण लागवड 2025-26 या उपक्रमाव्दारे 745 क्विंटल सूरण बियाणे (कंद) वाटप करण्यात येत आहे. या बैठकीत प्रतिनिधीक स्वरुपात काही शेतकऱ्यांना सुरण लागवडीसाठी सुरण कंदाचे वाटप करण्यात आले.

यावेळी मुरबाड तालुक्यातील धसईचे रहिवासी अरविंद राजाराम घोलप यांनी जिल्ह्यात प्रथमत: कृषि यांत्रिकीकरण योजनेंतर्गत एक एकर कापणी एका तासात पूर्ण करण्याची क्षमता असलेल्या कम्बाईन हार्वेस्टरचा वापर केला त्याबद्दल श्री. घोलप यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

00000000000

 

 


Comments

Popular posts from this blog

गायमुख घाटामधील वाहतूक कोंडीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ ॲक्शन मोडमध्ये

विशेष लेख क्र.33 - जिल्हाधिकारी अशोक शिनगारे: लोकसेवेचा दीपस्तंभ

तहसिलदारांच्या खुर्चीत शिपाई..! ; 36 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर तातू ठाकरेंचा अनोखा गौरव