कोपरी-पाचपाखाडीत मतदार पुनरिक्षण मोहिमेला वेग जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ‘Enumeration Form’ चे वाटप

 


         ठाणे,दि.1(जिमाका) : १४७ - कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघात विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार नोंदणी आणि जनजागृती मोहिमेने गती घेतली आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ आणि उपजिल्हा निवडणूक अधिकार श्रीम.वैशाली माने यांच्या प्रमुख उपस्थितीत मतदारसंघातील नागरिकांना प्रत्यक्ष भेट देऊन ‘Enumeration Form’ (गणना अर्ज) वाटप करण्यात आले.   

            प्रशासकीय यंत्रणा थेट मतदारांच्या दारापर्यंत पोहोचल्याने या मोहिमेला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या महत्त्वपूर्ण प्रसंगी १४७-कोपरी पाचपाखाडी मतदारसंघाचे उपजिल्हाधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी सर्जेराव मस्के-पाटील, तहसिलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी पुरुषोत्तम थोरात, ठाणे महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका श्रीम.नम्रता भोसले-जाधव, निवडणूक नायब तहसिलदार संजय साळुंके, बी.एल.ओ.उमेश खेडकर आणि महसूल सहाय्यक बापू पारेकर यांच्यासह इतर शासकीय अधिकारीकर्मचारी उपस्थित होते.    

            या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत मतदार यादी भाग क्रमांक २९७ मधील अनुक्रमांक १३५ चे रहिवासी श्री.सुरेंद्र इंदर भाटिया, अनुक्रमांक १३६ च्या श्रीम.कविता सुरेंद्र भाटिया, अनुक्रमांक २८७ चे श्री.विनोद गंगाधर पेणकर आणि अनुक्रमांक ४७१ च्या श्रीम.जयश्री विनोद पेणकर या मतदारांना प्रातिनिधिक स्वरूपात 'Enumeration Form' सुपूर्द करण्यात आले.

            हा उपक्रम विशेष सखोल पुनरिक्षण (Special Intensive Revision - SIR) कार्यक्रमाचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. ‘एसआयआर’ (SIR) मोहिमेचा मुख्य उद्देश मतदार यादीतील सर्व त्रुटी दूर करून ती पूर्णपणे अचूक, अद्ययावत आणि पारदर्शक बनवणे हा असतो. या प्रक्रियेअंतर्गत मतदारसंघात नव्याने राहण्यास आलेल्या नागरिकांची नोंद करणे, दुबार किंवा स्थलांतरित नावांची छाटणी करणे आणि पात्र तरुण मतदारांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले जाते. लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी ही अद्ययावत मतदार यादी अत्यंत पायाभूत ठरते. एकही पात्र मतदार नोंदणीपासून वंचित राहू नये म्हणून निवडणूक विभागाचे कर्मचारी आणि अधिकारी घरोघरी जाऊन अविरत परिश्रम घेत आहेत.

            नागरिकांनी आपल्या भागातील बी.एल.ओ. (BLO) आणि निवडणूक कार्यालयातून येणाऱ्या कर्मचाऱ्यांना अचूक माहिती देऊन, विचारण्यात आलेले अर्ज वेळेत भरून द्यावेत. अधिकृत आणि सशक्त लोकशाहीच्या निर्मितीसाठी ठाणे जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या या विशेष सखोल पुनरिक्षण मोहिमेला संपूर्ण सहकार्य करावे, असे जाहीर आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने सर्व नागरिकांना करण्यात आले आहे.

00000000000000

 




Comments

Popular posts from this blog

गायमुख घाटामधील वाहतूक कोंडीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ ॲक्शन मोडमध्ये

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी केली ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाची पाहणी

79 व्या स्वातंत्र्यदिनासाठी राजशिष्टाचार जारी; ठाण्यात जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्य शासकीय कार्यक्रम