नागरिकांना पारदर्शक आणि गतिमान सेवा देणे, हे प्रशासनाचे ध्येय -जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात 'सेवा हक्क दिन' मोठ्या उत्साहात साजरा उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव

 




ठाणे, दि.28(जिमाका) : महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी दरवर्षी २८ एप्रिल हा दिवस 'सेवा हक्क दिन' म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.     

            यावेळी जिल्हा प्रशासनातील विविध विभागांच्या उल्लेखनीय कामगिरीचा आढावा घेत उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.



क्यूआर कोडद्वारे सेवांची माहिती आता अधिक सुलभ..

            याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ यांच्या हस्ते विशेष 'क्यूआर कोड'चे अनावरण करण्यात आले. जिल्ह्यातील सर्व ३७ विभागांनी आपापल्या कार्यालयांच्या दर्शनी भागात हे क्यूआर कोड लावण्याचे निर्देश त्यांनी दिले. विशेषतः महसूल विभागाच्या सर्व सेतू केंद्रांवर आणि तहसील कार्यालयांत हे कोड उपलब्ध होतील, ज्यामुळे सर्वसामान्यांना आवश्यक कागदपत्रे आणि आपल्या हक्काच्या सेवांची माहिती एका क्लिकवर सहज उपलब्ध होईल.

प्रशासकीय कामगिरीचा उंचावणारा आलेख..

            1 एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या आर्थिक वर्षातील कामगिरीबद्दल समाधान व्यक्त करताना जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, प्रशासनाने 'आपले सरकार' सेवा केंद्रांच्या माध्यमातून नागरिकांना कालबद्ध सेवा देण्यात मोठे यश मिळविले आहे. महसूल आणि इतर विभागांतील अर्जांच्या निकालाची टक्केवारी ९५.१३ इतकी राहिली असून, हा आलेख यापुढेही असाच उंचावत राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पारदर्शक, गतिमान आणि कालबद्ध सेवा मिळणे हाच नागरिकांचा हक्क असून त्यासाठी प्रशासनाने सदैव जागृत राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

कर्तव्यदक्ष अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान..

            जिल्हास्तरावर तसेच तालुकास्तरावर उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) रूपाली भालके, गृह विभागाच्या उपआयुक्त (विशेष शाखा) श्रीमती मकवाना, कामगार उपायुक्त संभाजी वन्हाळकर यांचा समावेश होता. तसेच भिवंडीचे उपविभागीय अधिकारी अमित सानप, ठाण्याचे तहसिलदार उमेश पाटील, नायब तहसिलदार सत्यजित चव्हाण, दत्तात्रेय बर्डे यांच्यासह अंबरनाथ, मुरबाड, भिवंडी आणि शहापूर तहसील कार्यालयातील सहाय्यक महसूल अधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला. 

आदर्श आपले सरकार सेवा केंद्र (ग्रामपंचायत ) यांचा सत्कार..

            ग्रामपंचायत अंजूर ता.भिवंडी, ग्रामपंचायत सोनाळे ता.भिवंडी, ग्रामपंचायत चेरपोली ता.शहापूर यांनाही त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले.

            या कार्यक्रमास उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने, उपजिल्हाधिकारी सर्जेराव मस्के-पाटील, शशिकांत गायकवाड, वरूणकुमार सहारे, प्रांताधिकारी उर्मिला पाटील, उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे, तहसिलदार सचिन चौधर, संदीप थोरात यांसह अनेक वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन तहसिलदार संदीप थोरात यांनी केले.

00000000

 

 


Comments

Popular posts from this blog

भुवनेश्वर येथे पार पडलेल्या ज्युनिअर नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये ठाण्याच्या साईशा पवारने हर्डल्स शर्यतीत पटकाविले 'रजत पदक'

महाराष्ट्र राज्य निर्यात पुरस्कारांवर कोकण व मुंबई प्राधिकरण विभागाची मोहोर

भिवंडी तालुक्यातील पडघा येथे 21 सप्टेंबर रोजी ग्रामपंचायत स्तरावरील आर्थिक समावेशन सॅच्युरेशन शिबिराचे आयोजन